Thursday, May 30, 2013

Ek UnmaLNe.

एक उन्मळणं...

एखादं जुनं,रुंद खोडाचं घेरदार आणि उंच वाढलेलं झाड एक दिवस अचानक मुळापासून उन्मळतं; विजा चमकल्यासारखा काड् काड् आवाज होतो आणि ते कोसळतं ! जमिनीला कडकडून भेटतं ......
लोक आश्चर्य करतात, ‘ इतकं जुनं,इतकं भक्कम झाड उन्मळलं? विश्वास बसत नाही. कालपर्यंत कधी वाटलं नाही की उद्याच हे पडेल म्हणून !...पण किती उजाड वाटतंय्..ही जागाही भकास वाटतेय्...’
का घडत असेल असं ? झाड काही सांगू शकत नाही; पण त्याचं कोसळणं ही काही एक दिवसाची प्रक्रिया नक्कीच नाही. त्या दिवसाच्या कितीतरी काळ आधीपासून ते आतून ‘जळत’ असलं पाहिजे.पोखरलं जात असलं पाहिजे. त्याला आधार देणारी मुळं ज्या मातीत गेलेली असतात, त्या मातीची रोज धूप होत असते; मुळं उघडी पडलेली असतात; आधार सुटत असतो; पण ते बिचारं कसंतरी तग धरून असतं. रीतीप्रमाणे नव्या ऋतूचं स्वागत  करत फुलत असतं. गाभ्यातलं जळणं लपवून नवनवी पोपटी पालवी धारण करत हसत असतं. उघड्या पडलेल्या मुळांकडे पाहात स्वतःशीच हसत असतं. त्याला कळलेलं असतं की आता ते फार तग धरू शकणार नाही ! पण ही पक्ष्यांची नवी घरटी इथं वसली आहेत, त्यांचं काय? त्या पक्ष्यांचा संसार होईपर्यंत तग धरता येणार आहे ? उन्मळणं थोपवता येणार आहे ?
.........आणि तो दिवस येतोच ! कारण तग धरणं झाडाच्या हातात नसतं. म्हणून ते कोसळतंच. मघाशी सांगितलं तसं. ज्या जमिनीनं त्याला ‘जीवन’ दिलं त्याच धरणीच्या चरणी ते माथा टेकतं....
बुंध्याचा छेद लोकांच्या नजरेला पडतो. त्यांच्यात चर्चा होते; ते म्हणतात, ‘ आतून गाभ्याला कसं काळं झालं आहे पाहा. पण हे आतून कसं जळलं? वीज पडली म्हणावं तर बाहेरून ठीक दिसतंय्. विजेच्या तारा गेल्याहेत जवळून! त्यामुळे तर असं झालं नसेल ? पण पाहा ना; आतून एवढं पोखरलं गेलंय् तरी खूप तग धरला म्हणायचा. आतली कीड पाहता, ह्याआधीच उन्मळायला हवं होतं...!’ अनेकांचे अनेक तर्क !!
त्यांना कशी कळणार होती झाडानं जगण्याची केलेली पराकाष्ठा? जळत राहूनही फुलत राहण्याची किमया करण्यासाठी केलेली साधना? कुणाला कळणार होती ?
आता फक्त म्युनिसिपालिटीचा डंपर येण्याचीच वाट बघायची होती....बस् !
                                                                                                                              संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------



Saturday, May 18, 2013


माझे वडील रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांना खूप मान होता. ते स्वतःही गात असत ,वाद्ये वाजवीत असत. मैफली ऐकायला जात असत.. त्यावर परीक्षणं लिहीत असत...एकूणच आमच्या घरात (माहेरच्या) संगीतमय वातावरण असे. संगीताबद्दल बोलणं, संगीत ऐकणं, चर्चा करणं, घरी छोट्या बैठकी करणं....यातच आम्ही रममाण असायचो... घरी संगीत-प्रेमींचा राबता असायचा.... एखाद्या धबधब्याखाली उभं राहिल्यावर सचैल भिजायला होईलच ना! तशी मी संगीतात चिंब झालेली असायची...लहानपणापासूनच ! मी टीन-एज मधे होते तेव्हापासून,किंबहुना त्याही आधीपासूनच, मी वडिलांबरोबर मैफलींना जात असे..दर शनिवारी असे कार्यक्रम असतच. मीही दहा वर्षांची असल्यापासून संगीत शिकतच होते. माझे पहिले शिक्षण धुळ्याच्या श्रीपाद रामचंद्र नाईकसर यांचेकडे झाले होते. गाणी ऐकून कान ‘तयार’ व्हायला पाहिजेत, असे माझे वडील सांगत व त्यांच्याबरोबर मैफलींना नेत.
माझे सद् भाग्य असे की पं.भीमसेन जोशींसारखे गायक मी तेव्हापासून ऐकले.. तेव्हा ते उदयाला येत होते. सवाई गंधर्वांचे जावई डॉ.व्ही.एस. देशपांडे (त्यांचे नावही वसंतरावच होते) हेही वडिलांचे मित्रच !  अष्टपैलू गायक वसंतराव देशपांडे (राहुल चे आजोबा ) हेही बैठकीतले. ह्या सर्वांची गाणी मी वडिलांसह भरभरून ऐकली. गाणे समजू लागले होते. त्यातील बारकाव्यांचा  आस्वाद कसा घ्यायचा हे वडील सांगत असत. तंबोरे लावण्यापासून, तबला व हार्मोनियमची साथ कशी लक्ष देऊन ऐकावी याचंसुध्दा ते स्पष्टीकरण करत असत..... आज कळतंय् की त्यांनी रसिकतेच्या आनंदाची, अलीबाबाची गुहाच माझ्यापुढे उघडून दिली होती !
त्याकाळात भीमसेनजींच्या मैफली सतत होत असत. म्हणजे हिमालय तेव्हा घडत होता ! आणि तो घडतांना बघण्याचं भाग्य मला लाभलं !! पुण्याच्या टिळक रोडवर त्यावेळी ‘राम एजन्सी’ नावाचं मोठं शॉप होतं. बहुधा वाहनांचं. शनिवारी रात्री तो हॉल मोकळा केला जायचा; आणि मैफलीसाठी जागा व्हायची. काही शनिवारी, त्यावेळचे डीएसपी कागल यांच्या बंगल्यावरही भीमसेनजींचं गाणं व्हायचं. सौ.सीता कागलही गायिका होत्या. त्या सर्व मैफली आजही आठवतात....ते सोन्याचे दिवस ....
अशीच एकदा राम एजन्सीमधे भीमसेनजींची मैफल होती. माझे वडील रात्री नऊ वाजताच गेले होते. मात्र, काही कारणाने मी त्यांच्याबरोबर गेले नव्हते. मैफल 10 वाजता सुरू झाली. तब्बल सव्वा तास भीमसेनजींनी शुध्द-कल्याण म्हटला. त्यानंतर त्यांचे नेहमीचे आवडते नाट्यगीत व नंतर मध्यंतर झाला. माझ्या वडिलांनी कोणाची तरी सायकल मागून घेतली व ते तडक घरी आले. मला झोपेतून उठवून जागे केले व म्हणाले,
‘ ऊठ;ऊठ ! भीमसेनचा आवाज काय लागला आहे आज ! झोपू नको; आवर आणि चल !!’
मीही लगेच तयार होऊन राम एजन्सीत पोहोचले. तंबोरे लावणं चालूच होतं. त्यांचा सुरेल गुंजारव सुरू झाला तेव्हाच कळलं की आता माझा आवडता ‘आभोगी’ राग ऐकायला मिळणार. म्हणजे पर्वणीच ! अशी त्या दिवसाची आठवण मनात घर करून राहेली आहे.  माझ्यावर रसिकतेचे संस्कार करून त्यांनी जे उपकार केले त्याला तोड नाही.......
********************************************************************************

Sunday, May 12, 2013


रुपेरी पडद्यावरची ‘ट्रजिडी क्वीन’ मीनाकुमारी आठवतेय् ? जुन्या परिणीता मधली ? अशोककुमारवर मूक प्रेम करणारी ! सिनेमाभर दुःख सहन करणारी ! खूपशा सिनेमांमधून ती स्वतः रडायची आणि प्रेक्षकांना रडवायची. म्हृणजेच उत्तम अभिनय करायची. दिसायचीही छान. तिचा शेवटचा सिनेमा होता ‘पाकीजा’. मला आठवतंय्, पूर्वीच्या पुण्यात डेक्कन जिमखान्यावर ‘हिंदविजय’ नामक त्यावेळचं शानदार थिएटर होतं. तिथं पाकीजा लागला होता. आम्ही मीनाकुमारीचे ‘फॅन’, तो बघायला गेलो होतो. सिनेमा एकदम मधेच थांबला आणि पडद्यावर पाटी आली, ‘मीनाकुमारी यांचे आजच अमुक वाजता दुःखद निधन झाले’ !
आम्हीही  दुःखात बुडालो व अश्रू गाळतच पुढचा सिनेमा बघितला होता...
ती मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होती. तिचं काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी तिला व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात. तिच्या शायरीतही दुःखाची झलक पाहायला मिळते.
हे दोन शेर वाचा----
            आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
            जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
                  हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
                  हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....
ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास)  बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !
दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
-----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....
हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...
प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!                संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------  

Tuesday, May 7, 2013


प्रेम.....एक उलटा विचार...
तुलसी ऐसी प्रीत न करियो  जैसे पेड खजूर
धूप लगे छाया नहीं, भूख लगे फल दूर.....
            -----संत तुलसीदास
तुलसीदासांच्या मते प्रीतीला काहीच अर्थ नाही. प्रीती ही खजुराच्या झाडाप्रमाणे आहे.... ते म्हणतात, ऊन लागतं आहे म्हणून ते झाड सावली देतं का?.....उत्तर—‘नाही.’  बरं; भूक लागलीए म्हणावं तर त्याची फळं तरी खायला मिळतात का?...उत्तर...’नाही!’ सावली नाही, कारण खजूराचं झाड एवढं उंच असतं की त्याची सावली जमिनीवर पडतच नाही ! तसंच ते उंच असल्यामुळे फळांपर्यंत हात पोहोचतच नाही...! म्हणूनच प्रीतीला त्यांनी खजुराची उपमा दिली.. आणि प्रेम करूच नका असा सल्ला देखील दिला.
एकीकडे, जग प्रेमावरच चालतं, प्रेमाशिवाय मानव-जन्म व्यर्थ आहे असं म्हटलं जातं; त्याचीच ही दुसरी बाजू ! तसंही प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच ना ! मग, माणसा-माणसातील प्रेमाच्या ह्या दुस-या बाजूचाही विचार करून पाहू. तसे करायला काय हरकत आहे?
तुलसीदासांच्या मते प्रेमाला अर्थ नाही, असं म्हणण्यापेक्षा, तुलसीदास विज्ञान(सायन्स) जाणत होते असं म्हणणं जास्त योग्य होईल. म्हणूनच तर त्यांना प्रेमासाठी खजूराच्या झाडाची उपमा सुचली !!
प्राणिमात्रांमध्ये,म्हणून माणसातही, नर-मादींमध्ये असणारं आकर्षण ही एक निसर्गदत्त बाब आहे, ती एक सहजप्रवृत्ती आहे; instinct आहे. प्रजोत्पादन व्हावं, वंशसातत्य टिकावं हा जीवशास्त्रीय(biological)उद्देश त्यामागे असतो. एखाद्या जातीची जपणूक करण्यासाठी प्राण्यांवर सोपविलेली ती एक नैसर्गिक जबाबदारी. अस्तित्त्व टिकविण्यासाठी असलेली एक तात्पुरती नैसर्गिक गरज. ह्या आकर्षणाला प्रेम हे नाव देऊन त्याचा फारच बोलबाला व उदोउदो केला जातो. कथा, कादंब-या,चित्रपट अशा सर्वच बाजूंनी त्या सहजप्रवृत्तीचं उदात्तीकरण केलं जातं. इथंच तरुणांची फसगत होते. त्या वयात असलेल्या शारीरिक आकर्षणालाच तरुणवर्ग प्रेम हे काहीतरी भव्य-दिव्य, उच्च-उदात्त असं समजून त्या मृगजाळामागे धावतात. पदरी बहुधा निराशाच येते. तशी ती आली की तरुणाई, अस्तित्त्वातच नसलेल्या ‘प्रेमाला’ बोल लावत बसतात. काही अतिसंवेदनशील (hypersensitive) व्यक्ती नैराश्य-अंधःकारातून बाहेरही येऊ शकत नाहीत. कधी जीवनही संपवतात.
प्रेम, हे नैसर्गिक गरजांचंच दुसरं नाव आहे हे समजून घ्यायला हवं.यातून कुठलंही नातं वगळता येणार नाही ! लहान मुलाची आईकडे ओढ असते.यालाही कारण आहे. ती त्याला दूध पाजते,सुरक्षितता देते, त्याच्या सर्व गरजा भागविते, म्हणूनच ते तिच्यावर अवलंबून राहातं. जसजशी ती गरज संपते, तसतसं ते सुटं होत जातं. मोठं झाल्यावर आईकडून त्याचं ‘प्रेम’ पत्नीकडे शिफ्ट होतं. कारण गरजा बदलतात.
आईला मुलाबद्दल वाटणारं प्रेम हे प्रेमाचं सर्वात उदात्त प्रेमाचं स्वरूप मानलं जातं. कारण ते निःस्वार्थ असतं. पण तोही एक स्वतःवरच्या प्रेमाचाच एक भाग असावा. कारण ते मूल तिच्या रक्ता-मासाचं असतं; आणि वेगळं झालेलं असलं तरी एकदा ते मूल तिच्याच शरीराचा हिस्सा असतं. पित्याला मुलाबद्दल वाटणारं प्रेमही त्याच कारणामुळे असावं. ‘हे मूल निर्माण होण्यास मी कारणीभूत आहे,ह्याच्या मातेच्या उदरात मी रुजविलेल्या बीजाचं हे फळ आहे; याच्या अस्तित्त्वानं मी माझं पौरुष सेध्द केलेलं आहे;’ अशा स्वकेंद्रित भावनेलाच तो अपत्यप्रेम नाव देत असावा. माता-अपत्य वा पिता-अपत्य ह्यांच्यामधील प्रेमाचं हे अतिशय परखड व स्पष्ट (किंवा naked) असं विश्लेषण आहे. इतर नात्यांच्या बाबत तर प्रेम ह्या भावनेचा विचारही करावासा वाटत नाही.
इतरांबरोबर असलेले प्रेमाचे संबंध हे वेगवेगळ्या प्रकारे गरजमूलकच असतात. प्रत्येक नात्यात ‘मी’ चा कुठला तरी, सुप्त मनाच्या पातळीवरचा स्वार्थ असतो. विचार करा; समजा, तुमचा एखादा चांगला मित्र, काही काळानंतर तुमची रोज निर्भत्सना करू लागला, तुमच्या मानसिक स्वास्थ्याला धक्के देऊ लागला,तर तुम्ही त्याला नक्कीच टाळाल; व पुढे जाऊन त्याचा तिरस्कार करू लागाल. मग जर इतके दिवस तुम्हा दोघांमधे  प्रेम होतं, ते कुठे गेलं ? खरं तर तसं प्रेम नसतंच. मैत्रीची भूक, समवयस्कांच्या सहवासाची भासणारी गरज व त्यातून मिळणारा आनंद; तो आनंद आपल्याला हवा असतो. ती आपली गरज असते. तीच दोघे मित्र भागवत असतात. फक्त त्या गरजेला गोंडस नाव मिळतं प्रेम !
म्हणूनच, खरं प्रेम जगात नाहीच !! असते ती फक्त एकमेकांची गरज. ती पूर्ण होत नाही असं दिसलं की माणसं एकमेकांपासून अलग होतात. तसं होतांना मग कुठलीही रेशमी बंधनं आड येत नाहीत; गाठी सैलावतात; सुटूनही जातात. मग नदीच्या प्रवाहातल्या दोन ओंडक्यांची उपमा देऊन किंवा बिरबलाने सांगितलेली माकडीण व तिच्या पिल्लाची गोष्ट पुढे करून माणसं प्रेम ही गोष्ट अस्तित्वातच नसल्याची कबुली देऊन टाकतात. आश्चर्य हे, की हीदेखील माणसाची सहजप्रवृत्तीच असते !!   
प्रेमाची ही दुसरी व उलट बाजू तुम्हाला कशी वाटली ?
                                    ------  संगीता जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------


Sunday, May 5, 2013


उपेनने आज जुनी गाणी आय्-पॅड वर ऐकविली..आणि I went down the memory lane…!
ते स्वाभाविकच होतं...गाणं होतं –कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां, पिया जाने ना...अनुराधा या जुन्या सिनेमातलं... लीला नायडू व बलराज साहानी... भारतरत्न रविशंकर यांचं संगीत..शैलेन्द्रचे शब्द... लताचा आवाज...
....तो काळ होता, जेव्हा माझा आवाज खूप छान होता...मी हिंदी-मराठी लोकप्रिय गाणी भावपूर्ण अशी म्हणत असे...तेव्हा टेप-रेकॉर्डर वगैरे साधनं नव्हती..त्यामुळे लोक ..मित्र-मैत्रिणी नेहमी मला गाणी म्हणायला सांगत...गाणी ऐकण्याचा दुसरा मार्ग नसे....म्हणून मला ‘भाव’ मिळायचा...     
मला आठवतंय्, मी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होते. तो आमचा सेंड-ऑफ चा दिवस होता.  आम्ही सर्व मुले-मुली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या झूलॉजी डिपार्टमेंट मधे जमलो होतो.आम्हाला शिकवणारे बरेच प्राध्यापकही होते.. मुला-मुलींची व त्यांचीही भाषणे झाली..डिश देण्याआधी अचानक एक मुलगा(नाव आता आठवत नाही) उभा राहिला, व त्याने घोषणा केली, ‘ आता आपल्या वर्गाच्या ‘लतामंगेशकर’ रजनी देशपांडे या एक गाणं सादर करतील..’...मला अगदी अनपेक्षित होतं... पण असे प्रसंग परिचयाचे होते...तेव्हा मी हेच गाणं म्हटलं होतं. जे उपेन ने ऐकवलं..
कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां...पिया जाने ना
      नेहा लगाके मैं पछताई..सारी सारी रैना निंदिया ना आई..
      जानके देखो मेरे जीकी बतियॉं, पिया जाने ना....
      रुत मतवारी आके चली जाए..मनमें ही मेरे मनकी रही जाए
      खिलनेको तरसे नन्हीं नन्हीं कलियॉं... पिया जाने ना...
      कजरा ना सोहे, गजरा ना सोहे.. बरखा ना भाए, बदरा ना सोहे..
       क्या कहूं जो पूछे, मोसे मोरी सखियॉं..पिया जाने ना...

पूर्ण गाणं आठवलं; पण शेवटच्या ओळीला अडलेच !...हे अडणं नव्हे; हे अडखळणं आहे....ठेच लागणं आहे... कुठे गेला तो आवाज? कुठे गेलं ते हुबेहुब लताची नक्कल करण्याचं कसब? सगळ्यांना आनंद देणारे ते क्षण? त्यांच्या कौतुकानं ‘भरून पावल्याचं’ ते समाधान? कुठे गेलं माहीत नाही ; पण गेलं... माझा आवाज जायला नको होता.. माझं संगीत जायला नको होतं... खूप वाईट वाटतं... देवानं दिलेली आवाजाची ठेव मला जपता आली नाही.... आता त्याच्याकडे परत जाण्याचे दिवस आले...त्याने विचारलं तर काय सांगू...?
जुन्या गाण्यांच्यामागे अशा खूप कथा आहेत... माझ्या आठवणीत... त्या निदान अशा लिहून ठेवल्या तर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी..!

Wednesday, May 1, 2013


घर...
घर....माणसाची गरज.एक मूलभूत गरज. रोटी-कपड्यांइतकीच. रोटीएवढी हे जास्त महत्त्वाचं.
कारण रोटीमुळे पोटाची भूक भागते. घरामुळे भावनिक भूकही शांत होत असावी...व्हायला पाहिजे.
तरच ते ‘घर’! दगड-माती..कॉंक्रीटचे ठोकळे म्हणजे का घर?House & Home यातील फरक शिक्षकांनी शाळेत कधीतरी समजावून सांगितला होता. पण त्या सर्व लहान वयात शिकलेल्या गोष्टींचा खरा अर्थ मोठ्या वयातच कळतो.
      घर ‘उभारण्यासाठी’ आपण काय काय म्हणून करत नाही? काही मिळविण्यासाठी आधी काही गमवावं तर लागतंच. सृष्टीचाच नियम आहे तसा. म्हणूनच त्याग हे मूल्य महत्त्वाचं आहे. घरासाठी नुसत्या विटा जोडून थोडंच भागतं? माणसं ‘जोडावी’ लागतात. घरातली माणसं एकसंध राहावीत यासाठी कुणीतरी एकानं मधल्या भेगा किंवा फटी भरण्यासाठी स्वतःला ठिकठिकाणी विखरून घ्यावं लागतं...स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व विसरावं लागतं...
      अशा उभारलेल्या घराकडून ते उभारणा-या व्यक्तीची काय अपेक्षा असते? किंबहुना अपेक्षा असावी की  नसावी? ....याचं आदर्श उत्तर ‘नसावी’ हेच असणार. खरं आहे. अपेक्षा ठेवूच नये, म्हणजे दुःख होत नाही. कारण अपेक्षा आली की अपेक्षाभंगाचं दुःखाचं आलंच ! आध्यात्मशास्त्र असंच सांगतं. पण ह्या गोष्टी पचवणं फार कठीण आहे. ही संताची तत्त्वं सामान्य माणसांच्या अंगवळणी सहज पडत नाहीत. नाहीतर सगळेच संत झाले असते. सामान्य माणसाला ‘अपेक्षा’ असतातच.
      आदिमानवानं संरक्षणासाठी ‘घर’ वसविलं असलं तरी आजच्या माणसाला त्याहून अधिक काहीतरी हवं असतं. घराकडून...त्यात त्याच्याबरोबर राहणा-या माणसांकडून प्रेम हवं असतं. भावनिक सुरक्षितता हवी असते. आदिमानवाच्या वेळी त्याच्याभोवती जंगली श्वापदं होती. आताही माणसाच्या सभोवती त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची श्वापदं दबा धरून बसलेली असतात. स्पर्धा, अपयश, अपमान, नाकारलं जाणं, नापसंती....अशी केतीतरी ! मग... घरी माणसाला हवी असते ती आपुलकीची, प्रेमाची ऊब. सर्वात महत्त्वाची,जी घरी मिळावी अशी ती गोष्ट...emotional security..! ती जर नसेल तर? तर... मग घर म्हणजे विटांना...विटांवर केलेला गिलावा..!  किंवा ‘वीट’ झाकण्यासाठी त्यावर लावलेले ‘शोभिवंत’ थर !...चढवलेले रंग.... फक्त दिखाऊ सुशोभन !....
      एक कविता आहे......
      पुन्हा विटा..पुन्हा माती । पुन्हा बांधायाचे घर
      पुन्हा काळ्या बाहुलीस । टांगायाचे आढ्यावर ।।
      नव्या रंगसफेदीने । पुसायाचे ओरखडे
      मखमाली पडद्यांनी  । झुलायाचे मागेपुढे ।।
      कागदाच्या  फुलांनीही । पुन्हा व्हायचे सजीव
      कुठे जिवंतपणात । नको भासाया उणीव ।।
      चारी बिंतींनी द्यायचा । पुन्हा छतास आधार
      आणि ‘साफल्य’ नावाला । घालायचा पुष्पहार ...।।
ही कविता कोणाची आहे? ब्लॉग लिहिणा-या माझीच !      संगीता जोशी