Showing posts with label Glimpses. Show all posts
Showing posts with label Glimpses. Show all posts

Saturday, July 27, 2013

तो आणि ती...पूर्वीच्या काळातील...

                        एक टिपूर चांदणी रात्र ....त्रिपुरी पौर्णिमा असावी तसं.... हवेत हवाहवासा वाटणारा गारवा. (टिपूर शब्दाचा उगम त्रिपूर याच शब्दात असावा ) नदीचा बांध... गावापासून दूर... अगदी गावाच्या सीमेपार...सायंकाळपासूनच ती दोघं होती. त्या बांधावर...आतुरतेनं एकमेकांना भेटलेली. उत्कट प्रेमानं भरलेल्या मनानं..दोघांनाही खूप बोलायचं होतं..खूप सांगायचं होतं... पण संभाषणच अडलं होतं... ''किती थंडी आहे, नाही?''  आणि  ''हळूहळू वाढणारच आहे !''  या पलीकडे शब्द सरकत नव्ह्ते.
      ''उद्या किती वाजताची गाडी ?'' काहीतरी विचारायचं तसं ती विचारते.
तंद्रीतून जागं झाल्यासारखं तो उत्तरतो,  '' चारची. ''
      '' मी येऊ स्टेशनवर ? ''
      '' कशाला ?.... उगीच... सगळे असतील... ''
      '' मग आजच निरोप द्यायचा मी?''
      '' अगं, मी पुन्हा येईनच ना लवकर..''
      '' म्हणजे? परीक्षा अलीकडे आल्याएत? '' ती.
      '' नाही गं. परीक्षा झाल्यावरच... नेहमीप्रमाणे...''
      '' म्हणजे अजून सहा महिने.! तिचा कापरा स्वर.
      '' हे बघ, तू असं बोललीस तर माझा अभ्यास होणार नाही.'' तो.
      ''................'' तिचं मौन.
      '' आणि हो, मला दर आठवड्याला पत्र आलं पाहिजे हं तुझं. हॉस्टेलवर फोन घेता येत नाही !'' तो आर्जवून सांगतो.
      ती म्हणते, '' दर आठवड्याला नाही जमलं, तर?''
'' ते काही नाही !'' तो अधिकारानं सांगतो, '' नाहीतर माझं अभ्यासात लक्ष लागणार नाही....'' ती हसते अन् म्हणते, '' तूही पाठवशील ना ? का मला वाट पाहायला लावशील?''
'' पाठवीन. पण एखादेवेळी नाही जमलं तरी तू रागवायचं नाही..''
तिला माहीत असतं की तो पत्रातून हेच लिहिणार आहे ' रागावू नकोस, बरेच दिवसात लिहू शकलो नाही.....खूप सबमिशन होतं ...परीक्षाही जवळ येतेय्...'
      पुन्हा बांधावर ती भानावर येते..तो म्हणतो, '' चांदणं किती छान पडलंय् नं? चंद्र पहा किती सुंदर आहे ! मी गेलो ना, की तू रोज ह्या चंद्राकडे पाहात जा. मीही त्याचवेळी तिकडे चंद्राकडे पाहीन. हा चंद्र आपल्यामधे कॉमन. म्हणजे आपण शेजारीच उभे आहोत असे वाटेल. नाही का?''
'' पण चंद्र काही रोज नसतो... अमावास्या येतच असते.. तेव्हा ?... '' ती.
''तेव्हा अंधार हाच कॉमन फॅक्टर..गंमत आहे नं? '' तो तिची समजूत घालतो.
पुढे म्हणतो, '' बरं, उद्या मी जाणार ! आजच्या या चांदण्या रात्रीची आठवण राहील असं एखादं गाणं म्हण ना ...''
''नको, आसपास इतरही माणसं आहेत..'' तिचा मूड नसतो.
'' लांब बसलेली आहेत ती. लहान आवाजात म्हण पाहिजे तर..फक्त मला ऐकू येईल असं...''
ती संकोचते. खांद्यावरचा त्याच्या हाताचा स्पर्श तिला आग्रह करतो. आणि त्या ऊबदार क्षणी तिचे स्वर उमटतात...
      ''  रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला
         आज चांदनी की नगरी में अरमानों का  मेला....''
पण ती रात्र काही थांबणार नसते... आणि तो चंद्रही....!
काळही थांबणार नसतो....ते शंकर-जयकिशन...ती मीनाकुमारी, राजेन्द्रकुमार..राजकुमार ......सगळयांवर कधीच काळाचा पडदा पडला...
      पण असे कित्येक ''तो आणि ती'' आहेत ज्यांच्या मनात त्या सुरांचं एक शिल्पित मंदिर कायमचं उभारलं गेलंय्...दिल एक मंदिर...  

                                          संगीता जोशी.
---------------------------------------------------------------------------------------        



Saturday, May 18, 2013


माझे वडील रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांना खूप मान होता. ते स्वतःही गात असत ,वाद्ये वाजवीत असत. मैफली ऐकायला जात असत.. त्यावर परीक्षणं लिहीत असत...एकूणच आमच्या घरात (माहेरच्या) संगीतमय वातावरण असे. संगीताबद्दल बोलणं, संगीत ऐकणं, चर्चा करणं, घरी छोट्या बैठकी करणं....यातच आम्ही रममाण असायचो... घरी संगीत-प्रेमींचा राबता असायचा.... एखाद्या धबधब्याखाली उभं राहिल्यावर सचैल भिजायला होईलच ना! तशी मी संगीतात चिंब झालेली असायची...लहानपणापासूनच ! मी टीन-एज मधे होते तेव्हापासून,किंबहुना त्याही आधीपासूनच, मी वडिलांबरोबर मैफलींना जात असे..दर शनिवारी असे कार्यक्रम असतच. मीही दहा वर्षांची असल्यापासून संगीत शिकतच होते. माझे पहिले शिक्षण धुळ्याच्या श्रीपाद रामचंद्र नाईकसर यांचेकडे झाले होते. गाणी ऐकून कान ‘तयार’ व्हायला पाहिजेत, असे माझे वडील सांगत व त्यांच्याबरोबर मैफलींना नेत.
माझे सद् भाग्य असे की पं.भीमसेन जोशींसारखे गायक मी तेव्हापासून ऐकले.. तेव्हा ते उदयाला येत होते. सवाई गंधर्वांचे जावई डॉ.व्ही.एस. देशपांडे (त्यांचे नावही वसंतरावच होते) हेही वडिलांचे मित्रच !  अष्टपैलू गायक वसंतराव देशपांडे (राहुल चे आजोबा ) हेही बैठकीतले. ह्या सर्वांची गाणी मी वडिलांसह भरभरून ऐकली. गाणे समजू लागले होते. त्यातील बारकाव्यांचा  आस्वाद कसा घ्यायचा हे वडील सांगत असत. तंबोरे लावण्यापासून, तबला व हार्मोनियमची साथ कशी लक्ष देऊन ऐकावी याचंसुध्दा ते स्पष्टीकरण करत असत..... आज कळतंय् की त्यांनी रसिकतेच्या आनंदाची, अलीबाबाची गुहाच माझ्यापुढे उघडून दिली होती !
त्याकाळात भीमसेनजींच्या मैफली सतत होत असत. म्हणजे हिमालय तेव्हा घडत होता ! आणि तो घडतांना बघण्याचं भाग्य मला लाभलं !! पुण्याच्या टिळक रोडवर त्यावेळी ‘राम एजन्सी’ नावाचं मोठं शॉप होतं. बहुधा वाहनांचं. शनिवारी रात्री तो हॉल मोकळा केला जायचा; आणि मैफलीसाठी जागा व्हायची. काही शनिवारी, त्यावेळचे डीएसपी कागल यांच्या बंगल्यावरही भीमसेनजींचं गाणं व्हायचं. सौ.सीता कागलही गायिका होत्या. त्या सर्व मैफली आजही आठवतात....ते सोन्याचे दिवस ....
अशीच एकदा राम एजन्सीमधे भीमसेनजींची मैफल होती. माझे वडील रात्री नऊ वाजताच गेले होते. मात्र, काही कारणाने मी त्यांच्याबरोबर गेले नव्हते. मैफल 10 वाजता सुरू झाली. तब्बल सव्वा तास भीमसेनजींनी शुध्द-कल्याण म्हटला. त्यानंतर त्यांचे नेहमीचे आवडते नाट्यगीत व नंतर मध्यंतर झाला. माझ्या वडिलांनी कोणाची तरी सायकल मागून घेतली व ते तडक घरी आले. मला झोपेतून उठवून जागे केले व म्हणाले,
‘ ऊठ;ऊठ ! भीमसेनचा आवाज काय लागला आहे आज ! झोपू नको; आवर आणि चल !!’
मीही लगेच तयार होऊन राम एजन्सीत पोहोचले. तंबोरे लावणं चालूच होतं. त्यांचा सुरेल गुंजारव सुरू झाला तेव्हाच कळलं की आता माझा आवडता ‘आभोगी’ राग ऐकायला मिळणार. म्हणजे पर्वणीच ! अशी त्या दिवसाची आठवण मनात घर करून राहेली आहे.  माझ्यावर रसिकतेचे संस्कार करून त्यांनी जे उपकार केले त्याला तोड नाही.......
********************************************************************************

Sunday, May 5, 2013


उपेनने आज जुनी गाणी आय्-पॅड वर ऐकविली..आणि I went down the memory lane…!
ते स्वाभाविकच होतं...गाणं होतं –कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां, पिया जाने ना...अनुराधा या जुन्या सिनेमातलं... लीला नायडू व बलराज साहानी... भारतरत्न रविशंकर यांचं संगीत..शैलेन्द्रचे शब्द... लताचा आवाज...
....तो काळ होता, जेव्हा माझा आवाज खूप छान होता...मी हिंदी-मराठी लोकप्रिय गाणी भावपूर्ण अशी म्हणत असे...तेव्हा टेप-रेकॉर्डर वगैरे साधनं नव्हती..त्यामुळे लोक ..मित्र-मैत्रिणी नेहमी मला गाणी म्हणायला सांगत...गाणी ऐकण्याचा दुसरा मार्ग नसे....म्हणून मला ‘भाव’ मिळायचा...     
मला आठवतंय्, मी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होते. तो आमचा सेंड-ऑफ चा दिवस होता.  आम्ही सर्व मुले-मुली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या झूलॉजी डिपार्टमेंट मधे जमलो होतो.आम्हाला शिकवणारे बरेच प्राध्यापकही होते.. मुला-मुलींची व त्यांचीही भाषणे झाली..डिश देण्याआधी अचानक एक मुलगा(नाव आता आठवत नाही) उभा राहिला, व त्याने घोषणा केली, ‘ आता आपल्या वर्गाच्या ‘लतामंगेशकर’ रजनी देशपांडे या एक गाणं सादर करतील..’...मला अगदी अनपेक्षित होतं... पण असे प्रसंग परिचयाचे होते...तेव्हा मी हेच गाणं म्हटलं होतं. जे उपेन ने ऐकवलं..
कैसे दिन बीते, कैसे बीतीं रतियां...पिया जाने ना
      नेहा लगाके मैं पछताई..सारी सारी रैना निंदिया ना आई..
      जानके देखो मेरे जीकी बतियॉं, पिया जाने ना....
      रुत मतवारी आके चली जाए..मनमें ही मेरे मनकी रही जाए
      खिलनेको तरसे नन्हीं नन्हीं कलियॉं... पिया जाने ना...
      कजरा ना सोहे, गजरा ना सोहे.. बरखा ना भाए, बदरा ना सोहे..
       क्या कहूं जो पूछे, मोसे मोरी सखियॉं..पिया जाने ना...

पूर्ण गाणं आठवलं; पण शेवटच्या ओळीला अडलेच !...हे अडणं नव्हे; हे अडखळणं आहे....ठेच लागणं आहे... कुठे गेला तो आवाज? कुठे गेलं ते हुबेहुब लताची नक्कल करण्याचं कसब? सगळ्यांना आनंद देणारे ते क्षण? त्यांच्या कौतुकानं ‘भरून पावल्याचं’ ते समाधान? कुठे गेलं माहीत नाही ; पण गेलं... माझा आवाज जायला नको होता.. माझं संगीत जायला नको होतं... खूप वाईट वाटतं... देवानं दिलेली आवाजाची ठेव मला जपता आली नाही.... आता त्याच्याकडे परत जाण्याचे दिवस आले...त्याने विचारलं तर काय सांगू...?
जुन्या गाण्यांच्यामागे अशा खूप कथा आहेत... माझ्या आठवणीत... त्या निदान अशा लिहून ठेवल्या तर तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी..!