Thursday, June 9, 2016

अलीकडेच रिलीज झालेला 'सैराट' हा मराठी सिनेमा काल पाहिला आणि मी भारावून गेले. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं मनापासून अभिनंदन ! दोन प्रेमी जिवांची ही वास्तववादी कथा आहे.लोक म्हणतात, यात जातीयवाद आहे. पण मला वाटतं, तसं कुठेही भाष्य नाही.समाजातील दोन स्तरातील जिवांची ती कहाणी आहे. जातियवादी बटबटीतपणा कुठेही नाही. चित्रपटाचा स्क्रीन-प्ले इतका बांधीव आहे की कुठेही लूज-एंड नाही. प्रेक्षकाला खिळवून टेवण्याची ताकद त्यात आहे. कथा प्रभावीपणे पुढे नेली आहे.अनावश्यक तपशील हुशारीने टाळले आहेत. उदा. नायक-नायिकांचे हैद्राबादला येणे, नोकरी मिळणे, तेलुगु शिकणे, तिचे बाळंतपण, व शेवटी होणारी झटापट...सर्व टाळल्यामुळे कथेला 'पेस' आहे. शिवाय   त्यातून प्रेक्षकांच्या बुद्धीवर विश्वास दाखवला हे प्रतीत होतं ते वेगळंच !
शेवटी छोटा आकाश रडत जातो, पण ते रडणं आवाजरहित (Mute) ठेवल्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर शेवटच्या दृश्याचा प्रचंड impact होतो व राहतो. त्यामुळेच प्रेक्षक स्तब्धपणे चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो.
नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन उत्कृष्ट !
पहिलाच चित्रपट असूनही नायिकेचा अभिनय उत्तम आहे. सुरवातीची डॅशिंग अर्चना व नंतर प्रेमासाठी परिस्थितीशी जुळवून घेणारी पत्नी तिनं छान उभी केली आहे. श्रेय डायरेक्टरचेही आहे. पण ती राष्ट्रपती-पुरस्कारास पात्र होती हे निर्विवाद ! परशा ही उत्तम !
पात्रांची निवडही चांगली आहे.हा चित्रपट यशाची चढती कमान उभारत आहे, हे साहाजिकच आहे.

No comments:

Post a Comment