Monday, June 17, 2013

एक अनुभव              
                   ----- संगीता जोशी
काल माझी एका तरुण मुलीशी गाठ पडली. तिचं कॉलेज, अभ्यास अशा तिच्या वयाला साजेशा गो॑ष्टींबद्दल बोलणं झालं. मुलगी ओळखीचीच होती. विशीच्या उंबरठ्यावरची. मला कुतूहल होते की आजकालचे तरुण देव, आध्यात्म इत्यादि विषयांसंबंधी काय विचार करतात? म्हणून मी सहज तसा विषय काढला. ती म्हणाली, ‘थांबा; आधी कालच घडलेली एक गोष्ट सांगते. काल मी कॉलेजजवळून पायी चालत जात असतांना रस्त्यावर एक आई व तिची मुलगी खेळ करत होते. ती मुलगी पाच सहा वर्षांची असेल; ती कोलांट्या उड्या मारत होती आई डफावर काडी घासून काहीतरी आवाज काढत होती.’
मी म्हटलं, ‘ते डोंबारी असतील’.
तो  शब्दही तिच्या परिचयाचा नव्हता ! इंग्रजी मीडियम ना !
‘पुढे काय झालं?’ मी विचारलं.
ती सांगत राहिली अन् मी स्तब्ध ऐकत राहिले. ती म्हणाली,
‘ब-याच कोलांट्या मारून झाल्या.तोपर्यंत बरीच गर्दी झाली होती. मग ती मुलगी जमलेल्या लोकांकडून पैसे मागू लागली. विनवणी करणारे लाचार भाव तिच्या चेह-यावर होते. ती सगळ्यांपुढे हात पसरत होती. पण कोणीच तिला पैसे देत नव्हतं. मला वाटलं की  मी तिला काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणून मी सॅकमधून काढून हाताला येतील तेवढे पैसे दिले. ते फार नसतील. पण ब-यापैकी होते. ती माझ्याकडे बघून खूप गोड हसली. अगदी तोंडभरून हसली.  मी पण हसले.. माझ्या आसपासची लोकंही हसत होती. त्या मुलीला जो आनंद झाला होता ना, त्यामुळे मला खूप आनंद झाला. तिचा आनंद पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि मला जाणवलं की ते आनंदाश्रू होते ! मुलगी आणि आई जायला निघाल्या. ती माझ्याजवळ येऊन म्हणाली, ‘बाय् दीदी’ ! मी पण बाय म्हणाले. बाय करतांना तिनं माझ्याकडे पाहिलं ना, त्यात मला देव दिसला ! तिच्या डोळ्यात ! मला वाटतं, समोरच्या माणसात देव पाहाणं हेच आध्यात्म !’
ती विशीतली तरुणी बोलत होती न् मी अवाक् होऊन ऐकत होते ! आपण मागच्या पिढीतली माणसं नेहमी तक्रार करत असतो, की हल्लीची पिढी संवेदनाशून्य आहे; तंत्रज्ञाना च्या आहारी गेलेली आहे; उथळ विचारांची आहे....वगैरे. पण ह्या मुलीनं तरी ते  तेव्हा खोटं ठरवलं. मला खूप बरं वाटलं. कारण आशेचा एक किरण मला तिनं दाखवला होता. मी न राहवून तिचं कौतुक केलं. ‘तुला आध्यात्माचा अर्थ नक्कीच कळला आहे. या वयातही! ब-याच लोकांना मोठ्या वयातही हे कळत नाही ! तुझ्या आईनं तुझ्यावर केलेले संस्कारच हे बोलत आहेत.’
 रात्री मीसुध्दा आनंदात झोपी गेले.....आपली मतं याही वयात बदलली पाहिजेत..नवी पिढीही गहन विचार करू शकते हेच मनाला सुखवत होतं !!
------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment